हेची दान देगा
देवा तुझा विसर न व्हावा
आपल्या ह्या पोस्ट वर आपण गजानन महाराज अनुभव वाचणार आहोत, ह्या अनुभवला शब्दरूप
"श्री जयंत वेळणकर" सरानी दिले आहे । तर चला आपण ही वाचू या ।
जय गजानन महाराज ! श्री गजानन विजय ग्रंथाच्या
दहाव्या अध्यायात बाळाभाऊ आणि भास्कर पाटील यांच्यातील एक प्रकारे प्रसंग आहे.
बाळाभाऊ मुंबईला नोकरीचा राजीनामा देऊन शेगांवला महाराजांच्या चरणी लीन होण्यासाठी
येतात तेव्हा, भास्कर पाटील त्यांना म्हणतात ओढाळ बैल हिरव्यावर/ पाहे पडाया निरंतर/ त्यास जरी दिला मार/ तरी तो येई तेथ
पुन्हा/ तैसी लोचटा तुझी कृती/ झाली जयाला विरक्ती/ त्यानेच येथे यावे
रे..भास्कराचं हे अहंकाराचं भाषण महाराजांना पटलं नाही म्हणून पुढे महाराजांनी
बाळाभाऊला मारून त्याची परीक्षाही घेतली. त्याची योग्यताही सिध्द केली आणि 'अहंकार योग्य नव्हे ' हा धडाही भास्कराला दिला .
या प्रसंगाचा आम्ही
गजानन महाराज भक्तांनी शांतपणे विचार केला तर यातून महाराजांची शिकवण स्पष्ट होते, ती अशी की एकतर दुसर्याच्या भक्तीवर, सेवेवर अविश्वास दाखवू
नका. त्याला कमी लेखू नका आणि दुसरं व महत्वाचं म्हणजे स्वतःचीच भक्ती श्रेष्ठ असा
अहंकार बाळगू नका. अर्थात त्याकाळी बाळाभाऊ, भास्कर यांच्या
माध्यमातून दिलेली ही शिकवण महाराज आजही आपल्याला देतात. हे डोळसपणे आपण विचार
केला तर लक्षात येईल.
या संदर्भात आज जे
विविध अनुभव आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत ते एकाच कुठल्या भक्ताचे नसून अनेक
भक्तांना जे वेळोवेळी अनुभव येतात ते प्रातिनिधिक स्वरूपात येथे प्रस्तुत आहेत.
मी दान देतो, देणगी देतो अशी भावना आपल्या मनात निर्माण होते. अन मग महाराज हळूच आपल्या
डोळ्यात अंजन घालतात. एकदा मी शेगांवला एक बर्यापैकी रक्कम देणगी म्हणून देण्याचे
ठरविले. थोडा अभिमान वाटला. मी देणगी काऊंटरवर उभा राहिलो. माझ्या समोर एक साधारण
परिस्थिती असावी अशा बाई उभ्या होत्या सोबत असलेल्या त्यांच्या सुनबाई कडून समजलं
की लहान मोठी कामं करून बरेच दिवसांपासून गजानन बाबासाठी त्यांनी ही ठेव जमा केली
आहे. एका कापडात जमा केलेली ती रक्कम मी देणार असलेल्या रकमेच्या दहापट होती.
पुढे एक गजानन महाराज
मंदिराचे ट्रस्टी भेटले. ते सांगत होते, आमच्या मंदिरातील
ध्यानगृहात आम्ही अर्धवट प्लॅस्टरींग करून खाली काही भाग तसाच सोडून दिला होता. एक
दिवस एक गृहस्थ आले, त्यांनी मला विचारलं हे असं का? त्यांना म्हटलं आम्हाला तिथे ग्रॅनाईट लावायचा आहे. त्यासाठी तीन लाख रुपये
हवेत पण सध्या आमच्या जवळ पैसा नाही म्हणून थांबलो आहोत. त्यावर म्हणाले मी
तुम्हाला सध्या ग्रॅनाईट देतो तुमच्या जवळ जसे पैसे येतील तसे थोडे थोडे करून मला
द्या. चार दिवसात मंदिरात ग्रॅनाईट पोहोचून काम सुरू झालं. ठरल्याप्रमाणे हळूहळू
आम्ही पैसे देत गेलो, आता जवळपास देणं पूर्ण झालं, शेवटचे पाच हजार बाकी होते. ते बाहेर गावी होते त्यांनी म्हटलं तुमच्या
मंदिराजवळच जी बॅन्क आहे तिथेच माझ्या खात्यात हे पैसे जमा करा. त्याप्रमाणे मी
बॅन्केत गेलो, चौकशी केली तेव्हा समजलं की तो त्यांचा लोन अकाउन्ट
होता व शेवटचा हप्ता भरायचा होता. मी अचंबित झालो. त्या गृहस्थांनी मंदिरासाठी तीन
लाख रुपये कर्ज काढून मंदिराला दिले. व्याज स्वतः भरलं आणि मंदिराचं काम करून
दिलं.
सत्कार्याला
सत्प्रवृत्त माणसांनी दिलेलं असं योगदान पाहून आनंदानं मन उचंबळून येतच असतं तर
कुठूनशी बातमी कानावर येते ' एका झाडू विकणार्या बाईनं स्वतःच्या गरजा कमी करून
भगवंताच्या चरणी एक लाख रुपयांचं योगदान दिलं!'
आम्ही गजानन महाराज भक्त ' गजानन विजय ' वाचण्यास प्रारंभ करतो. सुरूवातीला रोज एक अध्याय
वाचताना पुढे दशमी, एकादशी, द्वादशी ला आपलं पारायण पूर्ण होतं. नंतर एकासनी
पारायण होऊ लागतं. मग कुठूनसं कळतं की कुणीतरी एका दिवसात तीन पारायणं केलीत तर
अन्य कुणा भक्तानी एकवीस दिवसात एकवीस पारायणं केलीत. मग कुणीतरी म्हणतं माझ्या
आईने एकशे एकवीस दिवसात एकशे एकवीस पारायणं केलीत. आपण आनंदानं ऐकू लागतो तर कळतं
त्या अमुक आहेत ना त्यांची एका वर्षात पाचशे पारायणं पूर्ण झालीत. असं होता होता
खूप जणांना पोथी पाठ झाली आहे हे उमजतं. मध्यंतरी एका गुरूभगिनींचा फोन आला सहज
विचारलं 'गजानन विजय चं पारायण करीत असाल नं ?' त्या म्हणाल्या मी रोजच पारायण करते. मला पोथी पाठ आहे, त्यामुळे सकाळी कामं करता करता माझी आपली पोथी सुरू असते.
गजानन महाराज भक्त
एकत्र येऊन गप्पा करताना सहज कुणी म्हणतो परवा चिपळूणहून कळलं, कोकणात एक गृहस्थ आहेत त्यांनी आजपर्यंत गजानन विजयची दहा हजार पारायणं केली
आहेत. त्यासाठी त्यांना तीस वर्षे लागली, म्हणजे तीस वर्षे
त्यांनी केवळ तोच एक ध्यास उराशी बाळगला होता.
गजानन महाराज भक्त
करीत असलेले एक सत्कर्म म्हणजे ' गजानन विजय ग्रंथ ' भक्तांना देणे. आपण
अकरा विजय ग्रंथ दिले, आपल्याला समाधान वाटतं.यात एखादा भक्त आपल्याला सांगतो ' मी आजपर्यंत किती ग्रंथदान केलं ते मलाच सांगता येणार नाही, मी दरमहा काही ग्रंथ गेली कित्येक वर्षे देत आलो आहे. ' यात कुणी शे दोनशे तर कुणी हजारही ग्रंथ दिलेले असू शकतात. एक महाराजांचे
भक्त होते त्यांनी जेव्हा गजानन महाराज आणि शेगांव लोकांना फारसं माहिती नव्हतं
तेव्हा एक अभिनव प्रयोग केला. शेगांवहून ग्रंथ घ्यायचे. साधारण परिचितांकडे किंवा
त्यांच्या ओळखीने अन्य ठिकाणी भेटून त्यांच्याकडे पारायण करायचं, त्यांना पारायणाचं महत्व समजावून सांगायचं आणि तो ग्रंथ त्यांना भेट
द्यायचा. आपण कल्पना करू शकत नाही अशा पध्दतीने लोक इथे कार्यरत असतात.
शेगांवच्या समाधी
मंदिराला प्रदक्षिणा घालणारा एखादा भक्त आपण पाहतो. तितक्यात एखादी गुरूभगिनी
म्हणते मी एकशेआठ प्रदक्षिणा पूर्ण करते नंतर गजानन विजयचं पारायण, पारायण मंडपात पूर्ण करते .कुणीतरी सांगतं माझ्या हजारो प्रदक्षिणा झाल्या
असतील तर कुणी म्हणेल माऊली मी शेगांव जवळच असतो, गेल्या अनेक
वर्षांपासून दर गुरुवारी एकवीस प्रदक्षिणा मी घालीत आलो आहे. मी मोजल्या नाही पण
कदाचित आज पर्यंत एकवीस हजार प्रदक्षिणा झाल्या असतील. आपण कुतूहलाने ऐकत असतो, तोच कुठूनसं कळतं की अमुक एका भक्तांनं एका दिवसात हजार प्रदक्षिणा केल्या
आहेत.
गजानन महाराज अनुभव |
शेगांव वारीचंही तसंच!
दूर दूरून पायी वारी करणारे तेही एक दोन वेळा नाही दर गेली कित्येक वर्षे
सातत्याने पायी वारी करणारे अनेक भक्त आहेत. आजूबाजूच्या परिसरातून तर दर गुरुवारी
भक्त येतातच, पण चांगल्या दूर अंतराहून दर गुरुवारी हजेरी लावणारे
हजारो आहेत. मध्यंतरी एक गुरूभगिनी सांगत होत्या. मी अकरा वार्या करायचं ठरविलं.
रेल्वेने रिझर्व्हेशन करून येते. माझी ती सातवी वारी होती. तो विदर्भातील ऐन उन्हाळा
होता. स्टेशनवर उतरले, मनात थोडं वाटून गेलं की व्वा, आपली सातवी वारी! स्टेशनच्या बाहेर पडले, एक म्हातारे गृहस्थ, डोक्यावर मुंडासे बांधलेले अनवाणी चालले होते. मुखाने जय गजानन बाबा, माझा गजानन बाबा!असं बोलत मंदिराकडे निघाले. त्यांना विचारलं, बाबाजी कुठून आलात? म्हणाले बाई दूर खेड्यातून आलो. आमच्या साठी कुठलं
वाहन असेलच असं नाही. जसं जमेल तसं यावं लागतं, पण मनात आस असते गजानन
बाबाला भेटण्याची! जय गजानन बाबा, माझा गजानन बाबा!म्हणत म्हणत ते दूर गेले. मी बराच वेळ
त्यांच्याकडे बघत राहून त्यांच्या वारीचा आदर केला.
आपण महाराजांसाठी
कार्यक्रम आयोजित करतो. वाटतं, निदान हजार लोक तरी यावेत. मग पुढील वेळी वाटतं अकरा
हजार, नंतर एकवीस,एकतीस. मध्यंतरी काही
भक्तांनी कार्यक्रम आयोजित केला सहज चौकशी केली किती लोक अपेक्षित आहेत? त्यांनी सुंदर उत्तर दिलं. म्हणाले, केवळ भव्यतेच्या मागे
आपण लागावं का? कारण आज जे भव्य आहे उद्या त्यापेक्षा अधिक भव्य होणार
आहेच. त्यामुळे भावपूर्ण अंतःकरणाने सर्वांचा सहभाग महत्वाचा आहे.
खरंच आहे! भव्यता आणि
भाव एकसाथ येत असतील तर प्रश्नच नाही. अन्यथा ' भाव भक्ती ' महत्वाची आहे हे आपण गजानन महाराज लक्षात घ्यायला हवं. गजानन महाराजांनी
बंकटलालाला म्हटलंच होतं. भाव भक्तीचं नाणं तुझ्या जवळ आहे म्हणून तुला पुन्हा
भेटलो.
एकंदरीत सर्व
भक्तांच्या अनुभवातून तात्पर्य हे की परमार्थात आपली भक्ती, आपली सेवा कुठे कमी वाटत असेल तर खंत करू नका, भक्ती करीत रहा. आपलीच
भक्ती मोठी असं वाटत असेल तर अहंकार तर अजिबातच धरू नका. कारण एक वेळ कमीपणाची खंत
अधिक भक्ती करायला प्रवृत्त करू शकेल परंतू अहंकार अत्यंत वाईट. तो आपली प्रगतीच
थांबवेल किंबहुना सर्वच संपेल.
तेव्हा कुणाची सेवा
कमी किंवा जास्त नसते. महाराजांनी ज्याला त्याला त्याची सेवा योजून दिलेली आहे. या
मार्गात स्वकर्मासोबत इतरांच्याही सेवेचा आदर करा. सर्वांच्या सोबत सर्वांच्या
भल्यासाठी महाराजांना प्रार्थना करा, मागणी करा. 'हेची दान देगा देवा
तुझा विसर न व्हावा ' भक्ताचं हित महाराजांना समजतं या भावनेनं म्हणत रहा.
गजानन महाराज अनुभव-हेची दान देगा देवा
गजानन महाराज अनुभव-हेची दान देगा देवा
No comments:
Post a Comment